जुन्या काळी भगवंताची नगरी म्हणून बार्शीची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णू देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील एकमेव विष्णू मंदिर आहे. 1245 साली हेमाडपंती शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड या पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे.
मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभार्यात गरुडखांब आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणूक शहरातून काढली जाते. मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. बार्शीचे खारमुरे प्रसिद्ध आहेत.
बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सूत गिरणी आहे जी आजपर्यंत चालू आहे. ही शाहीर अमर शेख यांची जन्मभूमी आहे. बार्शीत 12 ज्योतिर्लिंगे आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. बार्शी हे शिक्षणाचे माहेर घर म्हणतात.
बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून, मुंबईनंतर बार्शी अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल हे देखील सर्व सुविधांनी संपन्न हॉस्पिटल आहे.
बार्शीत वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक मठ आहेत. बार्शी हे लातूर ते कुर्डुवाडी या लोहमार्गावरचे मोठे स्थानक आहे.